Virat Kohli: भारतीय संघाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले आहे. या मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) फेल ठरला तर रोहित शर्माने (Rohit Sharma) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी करत शतक झळकावले. तर आता या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयने थेट इशारा दिला आहे. 2027 चा विश्वचषक खेळायची असेल तर देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार असा इशारा बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित शर्माला दिला आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की जर विराट आणि रोहित भविष्यात भारतीय संघासाठी एकदिवसीय सामने खेळू इच्छित असतील तर त्यांनी नियमितपणे देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. खेळाडूंसाठी सातत्यपूर्ण फॉर्म आणि फिटनेस सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल बोर्डाच्या वर्कलोड व्यवस्थापन धोरणाचा एक भाग आहे.
बीसीसीआयने धोरण बदलले
भारतीय संघ 3 ते 9 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळेल. या दोन मालिकांपूर्वी, विजय हजारे ट्रॉफी हा रोहित आणि विराटसाठी उपलब्ध असलेला एकमेव घरगुती क्रिकेट पर्याय आहे.
बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना विशेष सूट देत त्यांच्या मागील धोरणात बदल केला आहे. आतापर्यंत, दीर्घकाळासाठी संघाबाहेर किंवा ब्रेकवर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफी किंवा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची आवश्यकता नव्हती, परंतु आता हे अनिवार्य करण्यात आले आहे.
रोहित आणि विराटची आगामी उपलब्धता
तर दुसरीकडे माजी कर्णधार रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे की तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. तथापि, विराट कोहलीच्या उपलब्धतेबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण नाही.



