Manoj Jarang Patil : माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते.
माझ्या घातपात कटप्रकरणात बीडचा कांचन साळवी आरोपी नसल्यास तो 4-5 दिवस फरार का होता? असा सवाल जरांगेंनी केला आहे. या कटप्रकरणी धनंजय मुंडेची चौकशी झाली पाहिजे, कारण हा कट त्यांनीच रचला आहे, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
अजित पवार, तुम्ही धनंजय मुंडेवर पांघरूण घालणं थांबवा; अन्यथा 2029 ला मी तुम्हाला महागात पडेन, असा इशाराही दिला आहे. तसेच, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना चौकशीला पाठवावं, असं म्हणत धनंजय मुंडे, तुम्ही लपू नका; नार्को टेस्टसाठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची, मनोज जरांगे पाटील आणि माझी नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली होती.
तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या या मागणीनंतर आपण नार्को टेस्टसाठी तयार आहोत असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंना आव्हान दिले होते. तर आज पुन्हा एका मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे, तुम्ही लपू नका; नार्को टेस्टसाठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा असं म्हटलं आहे.



