Leopard Attack: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले वाढले असल्याने संपूर्ण जिल्ह्यात दहशत निर्माण झाले. त्यामुळे वनविभागाने बिबट्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. तर आता पारनेर तालुक्यातील किन्ही गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंगळवारी (2 डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतात खुरपणी करत असलेल्या भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय 65) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागूबाई हरभऱ्याच्या शेतात एकट्याच काम करत होत्या. अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. शेजारच्या शेतात असलेल्या त्यांच्या पतींनी आरडाओरड करत मदत मागितली, पण तोपर्यंत फार उशीर झालं होतं. मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या धक्कादायक घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभागाला पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र, वेळेत प्रतिसाद न दिल्याचा आरोप ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य अनिल देठे यांनी केला आहे.वन विभागाचा गलथान कारभार आणि त्याची किंमत एका वृद्ध महिलेला जीवाने चुकवली,असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे. तर जिल्हा उपवनसंरक्षकांनी नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बुधवार सकाळी 11 वाजेपर्यंत शार्प शूटर व आवश्यक आदेश देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
या घटनेनंतर किन्ही आणि बहिरोबावाडी परिसरात भीतीचं सावट आहे. महिलांना आणि शेतकऱ्यांना एकटं शेतात जाण्याची भिती वाटू लागली आहे. आता वन विभागाने निर्णायक कारवाई न केल्यास ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाला करण्याचा इशारा वन विभागाला दिला आहे.



