Maharashtra Election : राज्यात 29 महानगर पालिकाची रणधुमाळी सुरू असून फोडाफोडीचे राजकारण जोरात होताना दिसत आहे. यातच भाजपने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला जोरदार धक्का दिला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, विधानसभा प्रमुख सुभाष गुप्ता, रवी चिल्मे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य, भाजपाची विचारधारा आणि विकासाच्या राजकारणाने प्रेरित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश केलेल्या कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.
तर अभिमन्यू पवार म्हणाले की, औसा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्व जागा पूर्णपणे भाजपाच्या ताब्यात येतील. नगर पालिका निकालातही भाजपा बाजी मारेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
उबाठा आणि मनसेतून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये उबाठा गटाचे सारोळाचे सरपंच व चेअरमन संजय पाटील, शाखा प्रमुख पवन साठे, माजी सरपंच दिनेश पाटील, होळीचे माजी सरपंच शाहुराज जाधव, गोही तालुका उपाध्यक्ष नारायण भोसले, भुसणीचे माजी सरपंच बजरंग माने, हासेगाव शाखाप्रमुख राम भोसले, दिपक पाटील, अनंत पाटील, प्रकाश भोसले, नेनाजी जगताप तसेच मनसे जिल्हा उपाध्यक्ष गहिनीनाथ सोमवंशी आदींचा समावेश आहे.
अंबरनाथची जनता दडपशाहीच्या विरोधात मतदान करेल
अंबरनाथमधील सूज्ञ मतदार दडपशाहीच्या विरोधात मतदान करतील. निवडणुकांच्या काळात अंबरनाथ परिसरात जंगलराज वर्षानुवर्षे अनुभवास येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात गुंडगिरीला थारा नसून गुंडांना कठोर शासन होते. पारदर्शक व्यवहारासाठी भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, यात भाजपाला नक्की यश मिळेल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.



