Bihar Election Result : बिहार निवडणुकीची मतमोजणी आता जवळजवळ पूर्ण होत आहे. यावेळी देखील बिहारमध्ये एनडीए सत्ता स्थापन करणार आहे.
ताज्या ट्रेंडनुसार यावेळी एनडीएने 200 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीत महाआघाडीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. महाआघाडीला त्याच्या पारंपारिक बालेकिल्ल्यातही पराभव पत्करावा लागला.
आरजेडी आणि महाआघाडीचा गड मानल्या जाणाऱ्या सीमांचललाही मोठा पराभव पत्करावा लागण्याची शक्यता आहे.
ओवैसी 24 पैकी 6 जागांवर आघाडीवर
असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) सीमांचलमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून येते. ओवैसी यांच्या पक्षाने सीमांचलमधील 24 पैकी 6 जागांवर आघाडी घेतली आहे . मागील 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने 24 पैकी पाच जागांवर विजय मिळवला होता. सीमांचलमधील अनेक जागांवर एआयएमआयएमच्या प्रभावी कामगिरीमुळे सीमांचलमध्ये महाआघाडीला मोठे नुकसान सहन करावे लागले.
ओवैसी यांनी यापूर्वी सीमांचलमध्ये त्यांचा पक्ष चांगली कामगिरी करेल असे म्हटले होते. पक्षाने बिहारमध्ये महाआघाडीकडून फक्त सहा जागांची मागणी केली होती, परंतु राजदने स्पष्टपणे नकार दिला. ओवैसींनी महाआघाडीकडून मागितलेल्या सहा जागांवर पक्ष आघाडीवर आहे. यावेळी, सीमांचलमधील 24 जागांपैकी काँग्रेसने 12, राजदने 9, व्हीआयपीने 2 आणि सीपीआय (एमएल) ने 1 जागा जिंकल्या.
मुस्लिमांनी नितीशकुमारांवर विश्वास का ठेवला?
वरिष्ठ पत्रकारांचे म्हणणे आहे की उत्तर प्रदेशबद्दलच्या भीतीमुळे, बिहारमधील मुस्लिमांमध्ये एकमत निर्माण झाले होते की यावेळी नितीशकुमार यांना मजबूत ठेवले पाहिजे. त्यांनी असा युक्तिवाद केला की नितीशकुमार कमकुवत झाल्यास बिहारमध्ये उत्तर प्रदेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या भीतीने, मुस्लिम मतदारांनी एनडीएला, विशेषतः जेडीयूला मतदान केले.



