Rohit Pawar on Mahayuti: राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain In Maharashtra) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास 70 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज माफी देण्यात यावी अशी विरोधकांकडून सातत्याने होताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्पेशल आर्थिक पॅकेज देखील जारी केला आहे. मात्र मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केला आहे.
एक्स वर त्यांनी पोस्ट करत राज्य सरकारवर शेतकऱ्यांची (Farmers) फसवणूक करण्याचा आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले की, महायुती सरकारने मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली हे आता हळूहळू समोर येत आहे. राज्यभरात 70 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं, हजारो जनावरं दगावली, बळीराजा अक्षरश: कोलमडून पडला तरी सरकारच्या काळजाला सरसकट 50 हजार मदत करण्याचा पाझर फुटलेला नाही.
हेक्टरी 50 हजार तर दिले नाहीतच, पण जी तुटपुंजी मदत दिली त्यात देखील बागायती अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहूप्रमाणे आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना कुणाला 3 तर कुणाला 4 हजार अशी तुटपुंजी मदत देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे.
एकप्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला असून राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या या फसवणुकीबाबत संताप आहे. शिवाय अजूनही ना खरडून गेलेल्या जमिनीचे पैसे आले, ना जनावर दगावल्याचे पैसे मिळाले.. सरकारने आता तरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं आणि त्यांना पुरेशी मदत द्यावी, ही विनंती! असं रोहित पवार म्हणाले.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्ज माफी देण्यात येणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



