Pratap Sarnaik: एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देखील बुडते . विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. या पुढे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5-6 या वेळेत मुख्य बसस्थानक व ज्या ठिकाणी विद्यार्थी चढ-उतार जास्त होतो अशा थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
शाळेचा शेवटचा मुलगा अथवा मुलगी बस मधून सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून हलू नये अशा सक्त सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा- महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकार्यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.
विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी 1800221251 या क्रमांकावर एसटीची हेल्पलाईन सुरू
शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे ,तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने 1800221251 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. तरी या क्रमांकावर विद्यार्थी – विद्यार्थ्यांनींनी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.



