Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये वारसदार आणि नेतृत्व यावरून चर्चेला सुरुवात झाली आहे. अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या मागणीने महायुती सरकार आणि राष्ट्रवादीत खळबळ उडाली असून, अजितदादांच्या खुर्चीवर वहिनी बसणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करा
अजित पवार यांच्या अंत्यविधीनंतर भावूक झालेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांनी थेट सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. ते म्हणाले, दादांनी हा पक्ष रक्ताचं पाणी करून उभा केला. आज तो टिकवायचा असेल तर पवार कुटुंबातील व्यक्तीच पुढे हवी. सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान देऊन उपमुख्यमंत्री करणे ही कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. झिरवाळ यांच्या या विधानाने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
भावनिक लाट की अनुभवी नेते?
अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीमुळे राष्ट्रवादीत दोन मत प्रवाह दिसत आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांना राज्य राजकारणात आणून उपमुख्यमंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठी एकजूट आणि भावनिक लाट निर्माण होऊ शकते. पवार कुटुंबाचा वारसा टिकवण्यासाठी हा पर्याय सुरक्षित मानला जात आहे. छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांसारखे ज्येष्ठ नेते या प्रस्तावावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे . कौटुंबिक चेहर्याऐवजी अनुभवी नेत्याकडे सूत्रे सोपवण्याची मागणीही पुढे येण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आल्याने अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्या राजकीय भूमिकेवरही चर्चा सुरू झाली आहे. तरुण पिढीला संधी देण्याऐवजी वहिनी कडेच धुरा देण्याचा प्रयत्न अधिक व्यावहारिक असल्याचे बोलले जात आहे .
तर दुसरीकडे महायुतीतील भाजप आणि शिंदे गट सावध पावले टाकत आहेत. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली ‘वोट बँक’ टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा पर्याय महायुतीसाठी फायदाचा असू शकतो . दुसरीकडे, शरद पवार गटाकडूनही काही हालचाली होण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी “दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे दोन्ही गटांचे एकत्रीकरण” असा सूरही लावल्याचे पाहायला मिळाले .
अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळेल का, की पक्षात नवे समीकरणे रचली जातील? येणाऱ्या काही दिवसांतच याचे उत्तर मिळेल मात्र तोपर्यंत मात्र राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये भावनिक लाट उसळ्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



