Parth Pawar Land Case : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडून कंपनीकडून करण्यात आलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नवीन आणि मोठा खुलासा केल्याने पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दावा केला आहे की, जमीन व्यवहार घोटाळा समोर आल्यानंतर 6 नोव्हेंबर 2025 रोजी पार्थ पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले होते.
या पत्रामध्ये म्हटले आहे की, “सदर मिळकत आम्ही कायदेशीर मार्गाने सर्व कर वगैरे भरून घेतली आहे. तसेच कब्जे हक्काची रक्कमही भरलेली आहे. असे असतानाही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे आम्ही व्यथित झालो आहोत. या संदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा,” अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून पार्थ पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच या पत्रावर स्वतः पार्थ पवार यांची सही असल्याचा दावा देखील विजय कुंभार यांनी केला आहे.
तसेच आमेडिया कंपनीची स्थापना फक्त मुंढवा जमिनीच्या व्यवहारासाठी करण्यात आली होती असा दावा देखील या पत्रकार परिषदेत विजय कुंभार यांनी केला आहे.
तर दुसरीकडे या पुणे पोलिसांनी मोठी कारवाई या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. मात्र या प्रकरणात योग्य तपास होत नसल्याचा देखील आरोप विजय कुंभार यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.



